मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्ती अभियानानिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा उत्साहात संपन्न
यवतमाळ, दि. 30 : भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने "मोदी सरकारची १२ वर्षे – विकास, विश्वास व जनकल्याणाची" या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केमिस्ट भवन, शिवाजीनगर यवतमाळ येथे करण्यात आले. सदर कार्यशाळा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री तथा जिल्ह्याचे नेते मदनभाऊ येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, आमदार राजूभाऊ तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, कैलास बोंद्रे, रेखा कोटेकर, मोहन कणाके, शंतनू शेटे तसेच अभियान संयोजक प्रवीण कोकाटे व श्रीराम मेलकेवार उपस्थित होते.
प्रास्ताविक मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चौहान यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये २५ जून पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, ई-कचरा संकलन, वृक्षारोपण व वृक्ष संगोपन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येक मंडळात योग शिबिरांचे आयोजन, जनसंवाद शिबिर, जनकल्याण शिबिर, निबंध स्पर्धा, मोदी सरकारच्या विविध योजनांच्या लोगोवर आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच केंद्र सरकारच्या योजनांची प्रदर्शने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.कार्यशाळेत एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून अभियानाचे स्वरूप, विविध उपक्रमांची अंमलबजावणी, लाभार्थी संपर्क अभियान तसेच कार्यक्रमांचे नियोजन याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात मदनभाऊ येरावार यांनी मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. "घर-घर मोदी, जन-जन मोदी" हे अभियान प्रभावीपणे राबवून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.समारोपप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांनी बुद्धिजीवी संमेलन, सामाजिक संमेलन व विविध घटकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करून समाजातील सर्व स्तरांपर्यंत मोदी सरकारची विकासगाथा पोहोचविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन अभियान संयोजक श्रीराम मेलकेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यशाळेला जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष, महामंत्री, मोर्चा पदाधिकारी, अभियान संयोजक व सहसंयोजक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



إرسال تعليق